Saturday, 26 April 2025

३०. कृषी मेळावा


भाग : २८

     मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला असताना कॉलेजच्या माध्यमातून एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास सांगितले होते. एक दिवस साक्षी आणि सुमती, साक्षीचे बाबा संध्याकाळी त्या मेळाव्याला भेट देण्यासाठी निघाले.

तिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी, होलसेल विक्रेते, वितरक आले होते. वेगवेगळ्या नवनवीन शेतमालाला व्यासपीठ मिळावे या हेतूने केलेले हे आयोजन साक्षी तास भर पाहत होती. बाबांना कौतुकाने त्याबद्दल माहिती ही देत होती. तिला तिच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून यातल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. त्याची उजळणी तिची मनोमन सुरू होती.     

चालता चालता तिथेच एक मोठे बॅनर तिने वाचले. त्यावर गोडीवलीचे चित्र होते. मोठे मोठे द्राक्षांचे मळे आणि भानू चा ही फोटो त्यावर होता. शेतकऱ्याच्या पोशाखातला त्याचा फोटो पाहता क्षणी साक्षीने ओळखला. तिने जवळ जाऊन पाहिले आपल्याच ओळखीचे हे असल्याचे तिला जाणवले. आई बाबा पुढेच होते. नक्की काय ते पाहावे म्हणून ती दोन पावले मागे आली. तिथे नचिकेत बसला होता. फॉर्मल वेशातील नचिकेतला साक्षीने ओळखायला थोडा वेळ घेतला. साक्षी तिथेच थांबली. तो उठून उभा राहिला. तिच्या सोबत आलेले आई बाबा पुढे गेले होते. 

नचिकेतने साक्षीला मात्र लगेच ओळखले आणि म्हणाला " साक्षी ... कशी आहेस ? " 

साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला. साक्षी म्हणाली " मी ठीक आहे पण तू इथे... गावापासून दूर मुंबईत ? "

नचिकेत म्हणाला " हो ... आपले प्रोडक्ट गावात आणि जवळपास खूप विकले गेले. लोकांना आवडले. त्यांनी मला इथे पाठवले त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आज बघ , हे संपले की परत आपल्या गावी जाणार " 

साक्षी त्याच्याकडे पाहत राहिली, हा तोच मातीत, शेतात रमणारा नचिकेत आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या पेहरावात सुद्धा आता आमूलाग्र बदल झालेला होता, नचिकेत बिजनेस मॅन झाला होता. ती म्हणाली "... तू खूप बदलला आहेस, नचिकेत " 
    
नचिकेत म्हणाला " हो ... बदल आवडला आहे हा मला साक्षी ... त्याच वर्तुळात राहून पुढची वाट मिळत नव्हती. शेवटी आलो इथवर.आपल्या प्लांटला हळूहळू अजून डझनभर हात आणखी जोडले गेले. आता फार मोठे वर्तुळ झाले ते. साक्षी... परत येतेस का ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला ? " साक्षी भावून झाली.

आपल्या हाताने सुरवात करून मांडलेले प्रॉडक्ट ती हातात घेऊन पाहत होती. आता नवा साज चढला होता. 

नचिकेत म्हणाला " तुला आठवते का एकदा म्हणलेलीस " गावाच्या  सीमा बांधून ठेवतात... आज त्या सीमा पार करुन आलो बघ... मिस्टर साठेंच्या मदतीने आपले प्रोडक्ट देशाबाहेर ही जाणार आहे. " 

आपले शब्द आज ही नचिकेतच्या लक्षात आहेत आणि हा बदल झाला नसून घडवून आणला आहे. याचे निमित्त मी असेन या विचाराने साक्षी मनोमन खुश झाली. बोलायचे बरेच होते पण साक्षी काहीच बोलली नाही. फोन वाजला आणि "  लवकरच भेटू " इतकं बोलून ती पुढे निघून आली. नचिकेत तिच्याकडे पाहत राहिला, अगदी तसाच  ज्या प्रमाणे साक्षी गोडीवलीतून जाताना तो पाहत होता. त्याच वेळी नचिकेतचा फोन वाजला, तो फोन साक्षीचा होता आणि त्याच्या फोनमध्ये डिलीट केलेला साक्षीचा नंबर पुन्हा एकदा सेव्ह झाला गोष्टीची नव्याने सुरुवात करण्यासाठी तो ही कायमचा...

★★★★★★★★★समाप्त★★★★★★★★★★

Thursday, 24 April 2025

२९. निरोपाचा क्षण

भाग : २७

     पुढच्या दोनच दिवसात नव्या सेटअपचे पहिले प्रोडक्ट तयार झाले. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. नव्या लावलेल्या कलमांना ही टपोरी गोड द्राक्षे लागलेली दिसली.  दोन्ही कामात यश मिळाले होते. सगळे मजूर, माई, अण्णा, भानू, रेणू, मिस्टर साठे त्यावेळी तिथे उपस्थित होते. प्रत्येकाच्या मेहनतीचे फळ उत्तम आणि भरगोस मिळाले. त्या दिवशी साक्षी, आराध्या, सुमित, नचिकेत परत ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला गेले. खर तर ती संध्याकाळ संपूच नये असे प्रत्येकाला वाटत होते. पुस्तकातला एक धडा संपतो म्हणजे पूर्ण पुस्तक संपले असे होत नाही. काही वेळा ती नव्याची सुरुवात असते. कदाचित साक्षीला हेच हवे होते. नवे काही तरी या गावाच्या मातीत पेरून या कथेचा शेवट तिला करायचा होता. गोडीवलीत तिच्या या धड्याचा शेवट जवळ आला होता  याची तिला जाणीव झाली. अंधार वाढल्यावर सगळे माघारी आले.
          
साक्षी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन निघणार होती. साक्षी सकाळी आपले सामान सुमान घेऊन खाली आली. सगळ्यांना भेटली. माई, अण्णा, आराध्या कोणाचीच साक्षीला अलविदा करण्याची इच्छा नव्हती. निघताना तिला तिथे नचिकेत कुठेच दिसला नाही. ती सगळ्यांमध्ये त्याला शोधत होती. तिला नंतर कळले, पहाटेच तो प्रयोगशाळेत गेला आहे. शेवटी ती निघाली. सुमित तिला सोडायला तिच्यासोबत निघाला.

सुमितने गाडी मुद्दाम बागेच्या रस्त्याने  नेली. तिथे थांबवून साक्षीने सगळ्या मजुरांचा ही निरोप घेतला. रेणू, भानू आणि योगायोगाने भानूच्या मैत्रिणी सखू, सुमी,चिंगी तेव्हा चरायला तिथे आल्या होत्या. त्याचा ही निरोप घेतला. मनोमन जुन्या आठवणी आठवत तिच्या चेहऱ्यावर हसू आले होते. 

" भाऊ... या मैत्रिणींना कधी एकटे सोडू नका ... मी तुम्हा सगळ्यांना मिस करणार आहे ... माझी आठवण कायम सोबत असुद्या " तिने एक छान से पेन भानूला भेट दिले. म्हणाली " तुमच्या सगळ्या प्रश्नांना या पेनाने लिहुन ठेवत जा ... मला माहिती आहे. सायंटिस्टना सारखे प्रश्न पडतात आणि तेव्हाच नवे शोध लागतात. तुम्ही ते नक्की कराल भाऊ... " 

भानू भावुक झाला, खाली झुकला. साक्षीने शर्टाच्या खिशाला ते पेन लावले. रेणू मागुन हे सगळे पाहत होती. रेणूच्या जवळ जाऊन साक्षी म्हणाली, 

" रेणू ताई, मी सोनल ची जागा कधीच घेऊ शकणार नाही. पण मी सतत त्याचा प्रयन्त केला. माझं काही चुकलं असेल तर सॉरी ... तुझ्यातली झाशीची राणी अजून माझ्या सोबत आहे. ती माझ्यात होतीच. आता तिला आणखी एक आई मिळाली. तुला खूप मिस करेन मी रेणू ताई " 

रेणू काहीच बोलली नाही. ती मनातून फक्त खूप सारे आशीर्वाद देत होती. साक्षी वळली तेव्हा फक्त " पुन्हा कधी येणार साक्षी ताई ? " इतकंच ती बोलली. साक्षी काहीच बोलली नाही, जाऊन गाडीत बसली. तिथूनच तिने रेणूला अलविदा केले. सुमितला तिथून निघायला सांगितले. गाडी थेट बस स्टँडकडे न्यायला सांगितले. 

होकारार्थी मान हलवून ही सुमितने गाडी मात्र थांबवली ती ओढ्यापाशी ... तो म्हणाला " उतर एक मिनिटं ..  हा आमच्या गावचा ओढा आवडला ना तुला... जा एकदा जवळून बघून ये शेवटचं " 

साक्षी आता गाडीतून उतरणारच नव्हती. पण तिचे मन तिला त्यासाठी भाग पाडत होते. ती शेवटी उतरलीच. सुमित गाडीतच बसून होता. दूर कट्ट्यापाशी पाठमोऱ्या आकृतीत कोणीतरी बसलेले तिला दिसले. दोघे जण होते. तिने पुढे जाऊन पाहिले तर तीच सहा वर्षांची बाहुलीसाठी घर मागणारी मुलगी नचिकेत सोबत बसली होती. तिला ही तो ओढा आवडला होता. आता ही तिच्या एका हातात ती बाहुली होती आणि दुसरा हात नचिकेतने घट्ट पकडला होता. सोनलसाठी आणलेला तो झगा तेव्हा त्या मुलीने घातला होता. अबोली रंगाच्या फ्रॉक मध्ये तिला पाहून साक्षीच्या डोळ्यात पाणी आले. क्षणभर सोनल समोर बसल्याचा भास झाला. बाहुली घेऊन ती मुलगी उतरली आणि साक्षीला पायाशी जाऊन मिठी मारली. साक्षी खाली बसली. तिला पापी देऊन मिठीत घेऊन रडू लागली. 

हे सगळे सुरू असताना नचिकेत फक्त पाहत होता. आपल्या वाटचा आनंद समोर त्या मुलीच्या जवळ ओसंडुन वाहत होता. फार काही न बोलता त्याने फक्त इतकंच म्हणलं " पुन्हा भेटू ... साक्षी, मी तुझी वाट पाहीन "

साक्षीने नचिकेत कडे पाहिले, ती काहीच न बोलता गाडीत जाऊन बसली. बघता बघता साक्षीचा सुरू झालेला प्रवास परतीच्या वळणावर येऊन थांबला होता. फरक इतकाच होता की यावेळी घरची ओढ तिला तिथे थांबू देत नव्हती. पण तिचे मन मात्र तिथेच रेंगाळत होते. ओढ्यावर. दोलायमान मनस्थितीत शेवटी आपल्या परिघातून बाहेर आलेल्या तिच्या व्यक्तीमत्वाला तेच वर्तुळ पुन्हा बोलवत होते. जाता जाता इथे एक मोठे वर्तुळ निर्माण करून तिने सारेच सिद्ध केले होते. निघताना वर आलेला सूर्य त्या वर्तुळाची तिला जाणीव करून देत होता. त्याकडे पाहतच ती गाडीत बसली आणि सुमितने गाडी सुरू केली. नचिकेत गाडीला दूर जाताना पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात नकळत आलेले हे एक सुंदर स्वप्न होते... साक्षी... जे आता संपले असं त्याच्या मनाला वाटू लागले. साक्षी परत मुंबईला गेली. 

क्रमशः 

२८. परतीचा प्रवास

भाग : २६

         साक्षीच्या वागण्यातला बदल नचिकेतला जाणवला होता. त्याने घरी येऊन आराध्याला विचारले.

 " साक्षीचा हात कसा आहे आता ... ती ठीक आहे ना ... आज काही तरी वेगळीच वागत होती. तिला घरची आठवण येते का ? 

आराध्या म्हणाली " मला तसे काहीच वाटलं नाही. मी आली तेव्हा खोलीत ती आराम करत होती. नंतर तस आमचं फारसं बोलणं झालं नाही. तिला मी जेवणानंतर विचारते. ती आज खाली पण फार दिसली नाही. खोलीतच आहे. जेवणासाठी मी तिला बोलवायला जाते. तेव्हा येईल ती खाली " 

नचिकेत " बर ... बोलावं तिला " इतकंच म्हणाला आणि तिथून तडक खोलीत निघून गेला. जेवणाच्या वेळी सगळे आपापल्या जागेवर बसले. आराध्याने मुद्दाम विषय काढला

 " आता कसे काम सुरू आहे दादा... होतच आले असेल ना आता "

नचिकेत म्हणाला " हो ... जवळपास झालेलेच आहे, तीन दिवसात आपल्याला रिझल्ट मिळतील. आपले प्रॉडक्ट बनून ते व्यवस्थित राहते की नाही ? किती दिवस टिकते ? हे पाहायला पुढे थोडा वेळ जाईल. पण महत्वाचं काम आता जवळ जवळ झालेच आहे. "

 सुमित म्हणला " अरे वा ... म्हणजे मग आता परत आपल्याला ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला जाता येईल तर... हो ना साक्षी " 

साक्षीने एकदा नचिकेतकडे पाहिले आणि सुमितला म्हणाली " हो आपण जाऊन येऊ एकदा. माई, आण्णा काम आता शेवटच्या टप्यात आले. एक दोन दिवसात ते ही होईल. मग मी पुन्हा माझ्या घरी जायचा विचार करते. " 

आराध्या हे ऐकून म्हणाली " काय... अग लगेच  परवा म्हणजे. थांब की अजून काही दिवस, माझा या महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण होतोय दोघी एकत्र जाऊया की परत " 

साक्षी म्हणाली " आरु... नको अग आता अजून. हे सगळे लिहून मला पुढच्या ऍडमिशनची तयारी करायची आहे. त्याला आणखी वेळ लागेल. मी इथले सगळे काम पूर्ण करूनच जाणार आहे. पण आता जाऊ दे मला " 

कितीही लाटा दूर दूर वाहत गेल्या तरी किनाऱ्याला आदळून पुन्हा आपल्याच वाळूत येऊन शांत होतात. तसे काहीसे साक्षी चे झाले होते. तिने तिच्या मनाशी ठरवले होते. काहीही झाले तरी आपल्या घराच्या वाटेवर पुन्हा जायचे. घराची ओढ तिला सतत माघारी बोलवत होती. 

सुमित, भानू, रेणू काहीच बोलले नाही. नचिकेत जेवण करून उठला आणि काहीच न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. 

माई म्हणाली " साक्षी ... तू आलीस आणि आम्हा सगळ्यांसाठी एक आमच्या घरातलीच सदस्य झालीस ... कळलं पण नाही की तू आराध्याची मैत्रीण म्हणून आलीस, आम्ही विसरून गेलो की तू परत तुझ्या घरी जाणार आहेस ... बाळा खूप प्रगती कर, पण आम्हाला विसरू नकोस. " माईच्या डोळ्यात पाणी आले.

सगळ्यांची जेवण आटोपली. सगळे आपापल्या खोलीत गेले. साक्षीचा निर्णय हळूहळू सगळ्यांना मान्य झाला. नचिकेतच्या मनात मात्र साक्षीने प्रेमाचे बीज रोवले जे आता काही झाले तरी साक्षीचा निर्णय मान्य करत नव्हते. नचिकेतला साक्षीचे दूर जाणे मनाला वेदना देत होते. क्षणभर त्याच्या मनात तिच्या सोबत शहरात जाण्याचा ही विचार आला. त्या विचारात तो झोपी गेला.

 क्रमशः

Wednesday, 23 April 2025

२७. न तुटणारे बंध

भाग : २५

साक्षी तिच्या खोलीत आली. ती विचार करू लागली. आजवर झालेल्या प्रत्येक घटनेची ती साक्षीदार होती. न तुटणारे बंध आपसूकच जोडले गेले होते. बोलता बोलता नचिकेतच्या काळजाच्या अगदी जवळच्या दोन गोष्टी, गाव आणि द्राक्ष बाग यावर आपण त्याला उगाच बोललो याची तिला तेव्हा जाणीव झाली. अपराधीपणाची रेघ तिच्या मनावर कोरली गेली. कायमचीच. त्याच विचारात तिने आपला दुखरा हात हातात घेतला. आदल्या दिवशी झालेल्या  अपघाताचे व्रण तिच्या हातावर होते. सूज ही थोडीफार दिसत होती. जखमावरची फुंकर तेव्हा तिच्यासाठी अजाणतेपणी नचिकेत झाला होता त्यातच नचिकेतचा त्यावेळी आईला फोन आला. साक्षीची चौकशी केली. तिला घेऊन डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. साक्षीला हे ऐकुन मनोमन आनंदच झाला. तेव्हा माईने सुमितला सोबत घ्यायला सांगितले. सुमित तिला  डॉक्टरकडे घेऊन गेला. येता येता त्याने बऱ्याच दिवसांपूर्वी भानू, आणि नचिकेतचे दारा अडून ऐकलेले बोलणे साक्षीला सांगितले. साक्षीला सुमितच्या तोंडुन सगळे ऐकताना फार मोठा धक्का बसला. जी गोष्ट काल परवा आपल्याला ही माहिती नव्हती, त्यावर भानू, सुमित आणि इतर सगळे चर्चा करत असल्याचे तिला जाणवले. मनातुन ती दुखावली गेली. पण याबद्दल ती कोणाशी ही काहीच बोलली नाही. दवाखान्यात डॉक्टरांनी पुन्हा व्यवस्थित ड्रेसिंग केलं. दोघे ही घरी आले.

दुसऱ्या दिवशी नचिकेत तिच्यासाठी थांबला होता. दोघे एकत्र च मळ्यात जाऊ असा त्याचा मानस होता. ती त्याच्या सोबत गेली. पण फार काही बोलली नाही. तिथे गेल्यावर ही तिला हाताला च लागल्याने फारसे काही करता येत नव्हते. प्रत्येक वेळी तिची होणारी धडपड नचिकेत बघत होता. तिला मदत करण्यासाठी तो पुढे येऊन काही तरी करत आणि ती त्यामुळे आणखी दूरावली जात. काहीच काम धड होत नाही हे त्या दिवशी तिला जाणवले आणि तिने तसे त्याला सांगितले . दुपार नंतर रेणू डबा घेऊन आली. हाताला जखम झाल्यामुळे तिला जेवण ही करता आले नाही. नचिकेत म्हणाला

 " मी काही मदत करू का ? " 

तिने मदतीसाठी रेणू कडे पाहिले. रेणूच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने साक्षीला काही घास भरवले. जेवण झाल्यावर तिने नचिकेतला विचारले,

 " माझं काहीच काम झालं नाही आज... पुढे ही होईल असं वाटत नाही. मी घरी गेलं तर चालेल का ? 

त्याने होकारार्थी मान हलवली. शेवटी रेणू सोबत ती घरी गेली. बराच वेळ ती सुमितने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होती. तिने रेणूला विचारले, 

" रेणू ताई ... आपलं काम करण्यात मी कुठे कमी पडते का ? " 

रेणू म्हणाली " नाही साक्षी ताई... असं का वाटलं तुम्हाला " 

 " नक्की ना ... माझं कामात लक्ष आहे हेच महत्वाचे हो ना "  - साक्षी

 " हो ताई... तुम्ही किती मन लावून काम करता ... तुमचं कामात लक्ष नाही असं कोण म्हणेल " 
मला फक्त नाव सांगा... मग दाखवते त्याला काम काय असते ते " - रेणू

साक्षी हसायला लागली. म्हणाली " तू पण ना रेणू ... सोनलमधली दडलेली खरी झाशीची राणी तूच आहेस बघ " - साक्षी

सोनलचे नाव अचानक काढले आणि रेणूला गहिवरून आले. साक्षीला ते जाणवले. ती लगेच तिच्या जवळ गेली.

 " रेणू ताई... सॉरी ग मला अस काही बोलायलाच नको होते... आय एम सॉरी " 

रेणूचे डोळे पुसून ती रेणूच्या मिठीत शिरली. रेणूने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,

 " आपली काळजी घेणारं, आपल्याला ओळखणार, आपली आवड निवड जपणार एक माणूस सोबत असणं हे खरंच भाग्याचं लक्षण हाय ... तुम्ही खरंच लय भाग्यवान ताई... एवढी समदी जण तुमच्या जवळ आहेत, माझ्या सोनलच्या पदरचे सुख बी तुमच्या झोळीत पडो हीच त्या विश्वेश्वराला प्राथना " इतकं बोलून ती डोळे पुसत तिच्या खोलीतून निघून गेली. 

दिवसभरात झालेल्या घडामोडींचा साक्षी मागोवा घेत खिडकीशी बसली. नचिकेत, सुमित, भानू, माई आणि आता रेणू सगळेच तिच्या विचारांच्या भिंती भक्कम करत होते. एक क्षण हळवे झालेले मन दुसऱ्याच क्षणाला उसळून यावे. आठवणीत रमणाऱ्या मनाची अचानक चलबिचल व्हावी अशी काहीशी मनस्थिती तिची तेव्हा झाली होती.

क्रमशः 

Tuesday, 22 April 2025

२६. जुन्या आठवणी

भाग : २४

        रेणूने साक्षीला हाक मारली. नचिकेत क्षणार्धात भानावर आला आणि दूर झाला. साक्षी तिथेच बसली होती. रेणूने येऊन तिला पोटाशी धरले. तिच्या पाठीवरून हात फिरवत ती तिथेच थांबली.  नचिकेत तडक बाहेर निघून आला. भानू त्याच्या मागे मागे आला.  भानू तेव्हा काहीच बोलला नाही. दोघेही बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधारात कट्ट्यावर बसले. नचिकेतला क्षणभर काय होते हे ही कळले नाही. भानूने नंतर थोड्या वेळाने त्यांना विचारले,

" घरी वाट पाहत असतील ना समदी ... निघुया का दादा ? "

नचिकेतने त्याला आलिंगन दिले. त्याला म्हणाला,

" भानू होईल ना सगळे ठीक ... प्रत्येक जण मेहनत करतोय, यशाच्या वाटेवर इथे आनंद तर आहेच पण सोबत खोलवर होणाऱ्या जखमा पण आहेत रे... त्या बघवत नाहीत. " 
 
भानू म्हणला " दादा... तुम्ही काळजी करू नका ... होईल समद ठीक " 

भानू काही वेळ नचिकेतकडे पाहत मनातल्या मनात म्हणत होता. " देव तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका दादा "

कधी कधी काही गोष्टी का घडतात याची कारणे आपण बरेचदा शोधत असतो. खूप प्रयन्त केला तरी त्याचे उत्तर मिळत नाही. आपल्या मनातल्या वादळाला शांत करणारी व्यक्ती आपल्या शेजारी येते. आपल्या ही नकळत. बसते आणि हवी तशी शांतता आपोआप मिळते. प्रश्नोत्तराच्या वादळात शांत करणारी तशी व्यक्ती कधी कधी आपल्यासाठी देवासारखी होऊन जाते. आज नचिकेतला भानू मध्ये तसेच काहीसे दिसले. नचिकेत आणि भानू तिथून उठले गाडीत जाऊन बसले. भानूने बाहेरूनच हाक दिली 

" रेणू ताई, साक्षी ताई चला निघू आता " 

रेणू साक्षीला घेऊन आली. घरी पोहोचल्यावर आराध्याने साक्षीचा हात पाहिला. धावत जवळ आली. साक्षीचा हात बघून आराध्याने रेणूला विचारले,

" रेणू ताई, हे काय झालं हिला ? " - आराध्या

" ताई काच लागली... त्याची जखम झाली. दादांनी मलमपट्टी केली. साक्षी ताईला आराम करुदे ..." - रेणू

" साक्षी चल वर, उद्या डॉक्टर कडे जाऊ आपण... बघू किती लाल झाला हात... बापरे " - आराध्या

" अग विशेष काही नाही. दिवे गेले त्यामुळे कळलं  नाही इतकंच आता मी ठीक आहे आरु " साक्षी तिथेच बसली आणि म्हणाली. 

माईने आल्या आल्या तिला औषध गोळ्या दिल्या. लागलीच जेवण ही झाले. साक्षी आराम करायला खोलीत गेली. 

औषध घेतल्यामुळे तिला लगेच झोप लागली. नचिकेत काही रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी साक्षीला उठायला उशीर झाला. तो पर्यंत सगळे आपापल्या कामाला निघून गेले होते. साक्षी उठल्यावर माईने साक्षीची विचार पूस केली. तिला एक दिवस घरीच आराम करायला सांगितला. तिने त्या दिवशी घरी राहून च थोडे फार काम केले. बाकी वेळ माईसोबत बोलण्यात गेला. आराध्या, सुमित, भानू, नचिकेत सगळ्यांविषयी ऐकताना साक्षीला भारी कुतूहल वाटले. माई सांगता सांगता आठवणीत रमून गेली

 " आराध्या लहान होती ना तेव्हाची गोष्ट आहे साक्षी, एकदा नचिकेत आराध्याला घेऊन शहरात गेला होता. त्यात सुमित पण लहान होता. दोघे ही शाळेत शिकत होते. कॉलेजची सुट्टी होती तेव्हा दादा घरी आला होता. फार हौसेने दोघांना शहरात घेऊन गेला. दिवस भर फिरल्यावर परतीच्या प्रवासात आराध्याला सुमितने गाडीच्या मागच्या सीट वर बसायला सांगितले. ही आमची आरु झोपली तिथेच आणि कधी मागे डिकी पर्यन्त गेली कळलं नाही. सुमितला माहिती होते ती झोपलेली पण पठ्ठ्याने सांगितले नाही. मोठा गोंधळ झाला. नचिकेतला खूप मारले अण्णानी. गाडी पुन्हा जाऊन पहायची ही त्याला भ्रांत नव्हती. तो रात्र भर जेवला नाही. की कोणाशी बोलला नाही. आराध्या कुठे असेल या भीतीने आम्ही झोपलो ही नाही.  आता सारखे तेव्हा रस्तावर दिवे ही नव्हते. त्यामुळे सकाळ ची वाट पाहत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तशाच रडवेला चेहरा घेऊन नचिकेत आराध्याला शोधायला निघाला. गाडीत कोणी असेल हे ही त्याला कळले नाही. शेतातुन गाडी जाताना उड्या मारू लागली. त्यामुळे आराध्याला जाग आली. ती गाडीत रडायला लागली. तास भर दोघे तिकडेच होते. आराध्याला शांत करता करता दादा ची पार नाकेनऊ आलेली ग ... " 

माई हे सगळे सांगताना साक्षीला कंपनीत झालेला अपघात, ओढ्यावरचा घालवलेला तो दिवस आठवला. काजव्याच्या प्रकाशातले ते झाड आठवले. 

माई पुढे सांगत होती " तो प्रसंग आठवला की घरी कधी कधी हशा पण पिटतो. नचिकेत मात्र त्या दिवसापासून अगदी जबाबदार मुलगा झाला. कॉलेज संपवून जो घरी परत आला. तो आज वर सगळ्यांची काळजी घेत सोबत आहे, बघ. आम्ही सगळे त्यामुळे अगदी निश्चिंत आहोत. या घराला, शेतीवाडी, बागा या सगळ्यांना त्याची सवय लागली. त्याने ही फार जीव लावला आहे बघ साक्षी. अचानक माईंच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. साक्षीने भावनेच्या भरात त्यांना आलिंगन दिले. नचिकेत आणि भानू साक्षीच्या अगदी जवळची दोन माणसे झाली होती. ती ही तेव्हा रडू लागली. माईने हसून तिचे डोळे पुसले.. " असेच असते बघ... तुझ्या डोळ्यात पाणी ... वेडा बाई...दूरवर कुठेतरी बोलवणारे आपलेच आपल्याला शोधत येते. तू जशी आमच्यात आलीस. " 

दोघींच्या गप्पा तासभर सुरू होत्या. माईसोबत गप्पा मारताना आपसूकच साक्षीला आपल्या आईची आठवण झाली. ती भावुक झाली. माईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आपल्या आईला जशी मिठी मारायची तशीच मिठी साक्षीने माईला मारली. 

क्रमशः 

Monday, 21 April 2025

२५. हळवे तरंग

भाग : २४

      नचिकेत धावत प्रयोगशाळेत आला. त्याने साक्षीला पाहिले, तिथे इतरत्र काचा पडलेल्या दिसल्या. क्षणभर तो स्तब्ध झाला.  चुकीच्या ठिकाणी बर्नर आणि बिकर ठेवल्याने गरम होऊन तो फुटला होता. नचिकेतचे लक्ष साक्षीच्या हाताकडे गेले. बिकरची काच तिच्या हाताला लागली.  तो बाजूला करताना बर्नरचा  चटका लागून हाताला सूज ही आली आणि भळाभळा रक्त ही वाहू लागले. अंधारात काही कळत नव्हते. नचिकेत आत आला. त्याने टॉर्च सुरू केला. पाहतो तर साक्षीच्या हातातून रक्त वाहत होते. तिने त्यानंतर ही काही आवाज केला नाही. पण नचिकेतला मात्र तिचे हे वागणे आवडले नाही. त्याने अंधारातच first-aid box शोधला. तिचा हात पाण्याखाली धरला. बसून तिच्या हाताला मलम पट्टी केली. आता पर्यन्त सगळे ठीक होते. तिचा हात हातात घेऊन त्यावर औषध लावताना अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

आज वर कधी न पाहिलेले नचिकेतला असे साक्षी आज वेगळ्याच रुपात पाहत होती. प्रत्येकाला हुरूप देणारा नचिकेत एवढा हळवा झाला होता. तिला वेदना होत होत्या. पण तिने तोंडातून ब्र ही काढला नाही किंवा डोळ्यातून थेंब ही आला नाही. नचिकेतच्या डोळ्यातले पाणी मात्र बरोबर साक्षीच्या हातावर पडत होते. त्याचा हात साक्षीच्या जखमी हातावर अलगद स्पर्श करत होता. त्यावर हळूहळू फुंकर मारत त्याने औषध लावले. पट्टी ही लावून झाली. तेव्हा मात्र तिच्या तोंडून " आई ग " निघाले. नचिकेतने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या लागलेल्या हाताला जवळ घेऊन त्यावरून हात फिरवला. दोघेही भावनिक झाले. रेणू आणि भानू दोघे इतक्यात आले होते. ते दारातच स्थिर झाले. भानू ते पाहून स्थिमित झाला आणि म्हणाला, 

" हे कधी तरी होणारच होते " 

बराच वेळ साक्षी नचिकेतच्या मिठीत होती आणि नचिकेत काहीच बोलू शकला नाही. थोड्या वेळासाठी सारे अस्थिर जग एका मिठीत स्थिरावले होते.
    
रेणूला काही कळत नव्हते पण तिला आनंद झाला होता. साक्षीची काळजी करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली याचं तिला समाधान होते. तिच्या ही डोळ्यात पाणी आले. अंधारातच साक्षीने नचिकेतचे डोळे  पुसले. तिने  नचिकेतला पाणी दिले. तिच्याकडे पाहत तिच्या हाताला हातात घेऊन नचिकेत म्हणाला,

 " साक्षी... तू काळजी घेत नाही स्वतःची ... काम करताना तुला कळत नाही का काळजी घ्यायची ... काही झालं म्हणजे तुला ? " 

साक्षी काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेऊन पुन्हा एक मिठी मारली. नचिकेतच्या डोळ्यात परत पाणी आले. ती त्याला धीर देत होती. इतक्यात दिवे आले. भानू आणि रेणू दोघे ही आत आले. याच त्या भावनिक तरंगावर साक्षीचे विश्व अवलंबून आहे. याची जाणीव तेव्हा साक्षीला झाली. तिच्यातली बंडखोर वृत्ती हळूहळू निरव शांत आणि प्रवाही झाली ती त्यामुळेच. रेणू आणि भानू नचिकेत जवळ आले आणि भानूने आपला हात नचिकेतच्या खांद्यावर ठेवला. 

- क्रमशः

Sunday, 20 April 2025

२४. दुर्घटना

भाग : २३

     दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे घरची सगळीच मंडळी नचिकेतसोबत मळ्यात गेली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. अंधुकशी उद्याची चिंता होतीच पण त्या दिवशी सगळ्यांनी जमेल तितक्या आठवणी जमवल्या. गेल्या गेल्याच नव्या सेट अप चे दर्शन सगळ्यांनी घेतले. साक्षीचा त्यातला सहभाग पाहताना साक्षीच्या वडिलांना तिचा अभिमान वाटला. साक्षीच्या आईने मुंबईत दाखवण्यासाठी तिथले फोटो काढले. दुपारी जेवण झाले. गप्पा गाणी आणि नंतर ओढ्यावरचा सूर्यास्त पाहून सगळे घरी गेले. तिथला ओढ्यावरचा सूर्यास्त सुमतीच्या ही आठवणीत  राहिला. दिवसभराच्या कामानंतर आणि विरंगुळा नंतर घरी गेल्यावर फारशी ऊर्जा राहिली नव्हती. माईने मक्याची कणसे चुलीवर भाजली. कणसे खायला सगळे खाली बसले. कणसे खाऊन झाल्यावर भानू म्हणला,

" साक्षी ताईला आम्ही आता  समदिकडे तुमच्या शहरी भाषेत काय म्हणतात ते  तुम्हाला मिस करणार. "

सुमित आणि आराध्याने ही साक्षीच्या बाबांना तिला अजून काही दिवस तिथे थांबण्याची गळ घातली. तेव्हा बाबा काहीच बोलले नाही. रात्रीची जेवण आटोपून सगळे लगेच झोपले. 
    
दुसऱ्या दिवशी आपले सामान सुमान घेऊन साक्षीचे आई बाबा खाली न्याहरीला आले. साक्षी रात्री फार थकलेली असल्याने तिला फार काही  सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्या हातात असलेल्या बॅग पाहून साक्षी म्हणाली,

" बाबा माझं सामान वरच आहे. भरायचे अजून. मी आले थांबा माझी बॅग घेऊन " 

बाबा म्हणाले " साक्षी बेटा... तुझी बॅग राहूदे वरच. तुझं काम तू पूर्ण करून ये. आता आम्ही निघतो. मला सुट्टी अगदीच दोन दिवसाची मिळाली. नाही तर अजून थांबलो असतो. " 

" बाबा... पण ... " - साक्षी

" हो ... बेटा मला काल नचिकेत जी नी सांगितले सगळे. तुमचे काम मोठे आहे. इथल्या लोकांसाठी करतेस ना. काम अर्धवट सोडून येऊ नको. पूर्ण कर आणि घरी ये " - बाबा 

" खरंच बाबा " आंनदाच्या भरात तिने बाबांना मिठी मारली. 

" आई, मी लवकरात लवकर इथलं काम संपवून येते. " साक्षीच्या आई बाबांचा निरोप घ्यायला घरचे मोठे मंडळी जमले होते. सकाळची वेळ होती रेणू, माई आणि अण्णा आवरुन आले होते. बाकी सगळे आपापल्या खोलीत झोपले होते. त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन आई बाबा मुंबईला निघाले. तासभरानी नचिकेत, आराध्या, सुमित, भानू सगळे आले. त्यांना साक्षीचे आई वडील परत मुंबईत गेल्याचे कळले. 

सुमित म्हणाला " आले आणि गेले ही ! थांबायला हवे होते ना अजून काही दिवस ... " 

आराध्या म्हणाली, " साक्षी पण तुझ्यावरच मोठं टेन्शन हलकं झालं बघ, आता पूर्ण लक्ष घालून द्राक्षाच्या प्रोसेसिंगच काम हातात घेशील. " 

नचिकेत म्हणाला " हो तर ... काही दिवसांचा प्रश्न आहे साक्षी ... व्ही विल डू  इट " 

साक्षीला पुन्हा नव्याने हुरूप आला. 

काही दिवस नव्या कलमांची चाचणी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि नव्याने सुरू केलेले तांत्रिक काम सगळ्यात झोकून देऊन काम सुरू झाले. 
फळांचा ज्युस काढुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे आणि फरमेन्ट करायला ठेवणे ही प्रक्रिया होती. ते करताना मध्ये मध्ये त्याची क्वालिटी पाहत राहणे. यासाठी चाचण्या सुरू होत्या. दिवस संपून रात्र कधी होत कळत नसे. बराच वेळ आराध्या ही कंपनीतुन येऊन साक्षीला मदत करत असे. नचिकेतला या दरम्यान बरेच बाहेर ही फिरावे लागले. भानू आणि नचिकेत यांच्या शहराच्या ठिकाणी सतत फेऱ्या होऊ लागल्या.

साक्षी एक दिवस बराच वेळ तिथेच प्रयोगशाळेत थांबली होती. भानू नचिकेत शहरातून समान आणून तिथे ठेवणार होते. त्यामुळे ते ही तिथेच येत होते. रात्रीचे नऊ, सव्वा नऊ वाजले होते. रात किड्यांचा आवाज होता. साक्षीसोबत तेव्हा तिथे रेणू होती. रेणूच्या मदतीने ती काही तरी काम करत होती. अशात अचानक दिवे गेले. काय झाले पाहायला रेणू बाहेर आली. दूरवर नजर फिरवली. तिला फारसा अंदाज लावता आला नाही. थोडी आणखी पुढे गेली. योगायोगाने तेव्हा नचिकेत आणि भानू ही तिथेच समोरून येताना दिसले. रेणूच्या हातात कंदील होते. त्याच्या प्रकाशात तिने त्यांना ओळखले. 

रेणूने पुढे जाऊन दोघांना सांगितले " भानू रे... तिथं दिवे गेलेत, आपण बघूया का काय झालं ते ? तिथे काम राहिले साक्षी ताईचं " 

" अचानक काय झालं ? आत कोण आहे आता ... " - नचिकेत

" आम्ही दोघी होतो... साक्षीताई आहे आता आत " - रेणू 

" ती एकटीच आत आहे का ... भानू जा, पाहून ये, तिथे काय सिरियस इशू आहे  का ? अचानक वीज कशी गेली ? " - नचिकेत

" दादा मी बी जाते " - रेणू

" बरं जा ... " - नचिकेत

" इतका वेळ झाला तुम्ही इथे कसे " - नचिकेत

" अहो दादा... साक्षी ताईंना काही तरी काम होते. त्यासाठी थांबावं लागलं होत. " - रेणू

" तुम्ही तिथं जा... त्या एकट्याच आहेत " - रेणू

इतक्यात काचेची वस्तू पडून फुटल्याचा आवाज प्रयोगशाळेतुन आला. तिघेही घाबरले.  नचिकेत रेणूच्या हातचे कंदील घेऊन धावत तिथून प्रयोगशाळेकडे आला. इथे  अंधारात एक दुर्घटना घडली होती. 

क्रमशः

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...