Wednesday, 23 April 2025

२७. न तुटणारे बंध

भाग : २५

साक्षी तिच्या खोलीत आली. ती विचार करू लागली. आजवर झालेल्या प्रत्येक घटनेची ती साक्षीदार होती. न तुटणारे बंध आपसूकच जोडले गेले होते. बोलता बोलता नचिकेतच्या काळजाच्या अगदी जवळच्या दोन गोष्टी, गाव आणि द्राक्ष बाग यावर आपण त्याला उगाच बोललो याची तिला तेव्हा जाणीव झाली. अपराधीपणाची रेघ तिच्या मनावर कोरली गेली. कायमचीच. त्याच विचारात तिने आपला दुखरा हात हातात घेतला. आदल्या दिवशी झालेल्या  अपघाताचे व्रण तिच्या हातावर होते. सूज ही थोडीफार दिसत होती. जखमावरची फुंकर तेव्हा तिच्यासाठी अजाणतेपणी नचिकेत झाला होता त्यातच नचिकेतचा त्यावेळी आईला फोन आला. साक्षीची चौकशी केली. तिला घेऊन डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. साक्षीला हे ऐकुन मनोमन आनंदच झाला. तेव्हा माईने सुमितला सोबत घ्यायला सांगितले. सुमित तिला  डॉक्टरकडे घेऊन गेला. येता येता त्याने बऱ्याच दिवसांपूर्वी भानू, आणि नचिकेतचे दारा अडून ऐकलेले बोलणे साक्षीला सांगितले. साक्षीला सुमितच्या तोंडुन सगळे ऐकताना फार मोठा धक्का बसला. जी गोष्ट काल परवा आपल्याला ही माहिती नव्हती, त्यावर भानू, सुमित आणि इतर सगळे चर्चा करत असल्याचे तिला जाणवले. मनातुन ती दुखावली गेली. पण याबद्दल ती कोणाशी ही काहीच बोलली नाही. दवाखान्यात डॉक्टरांनी पुन्हा व्यवस्थित ड्रेसिंग केलं. दोघे ही घरी आले.

दुसऱ्या दिवशी नचिकेत तिच्यासाठी थांबला होता. दोघे एकत्र च मळ्यात जाऊ असा त्याचा मानस होता. ती त्याच्या सोबत गेली. पण फार काही बोलली नाही. तिथे गेल्यावर ही तिला हाताला च लागल्याने फारसे काही करता येत नव्हते. प्रत्येक वेळी तिची होणारी धडपड नचिकेत बघत होता. तिला मदत करण्यासाठी तो पुढे येऊन काही तरी करत आणि ती त्यामुळे आणखी दूरावली जात. काहीच काम धड होत नाही हे त्या दिवशी तिला जाणवले आणि तिने तसे त्याला सांगितले . दुपार नंतर रेणू डबा घेऊन आली. हाताला जखम झाल्यामुळे तिला जेवण ही करता आले नाही. नचिकेत म्हणाला

 " मी काही मदत करू का ? " 

तिने मदतीसाठी रेणू कडे पाहिले. रेणूच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने साक्षीला काही घास भरवले. जेवण झाल्यावर तिने नचिकेतला विचारले,

 " माझं काहीच काम झालं नाही आज... पुढे ही होईल असं वाटत नाही. मी घरी गेलं तर चालेल का ? 

त्याने होकारार्थी मान हलवली. शेवटी रेणू सोबत ती घरी गेली. बराच वेळ ती सुमितने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होती. तिने रेणूला विचारले, 

" रेणू ताई ... आपलं काम करण्यात मी कुठे कमी पडते का ? " 

रेणू म्हणाली " नाही साक्षी ताई... असं का वाटलं तुम्हाला " 

 " नक्की ना ... माझं कामात लक्ष आहे हेच महत्वाचे हो ना "  - साक्षी

 " हो ताई... तुम्ही किती मन लावून काम करता ... तुमचं कामात लक्ष नाही असं कोण म्हणेल " 
मला फक्त नाव सांगा... मग दाखवते त्याला काम काय असते ते " - रेणू

साक्षी हसायला लागली. म्हणाली " तू पण ना रेणू ... सोनलमधली दडलेली खरी झाशीची राणी तूच आहेस बघ " - साक्षी

सोनलचे नाव अचानक काढले आणि रेणूला गहिवरून आले. साक्षीला ते जाणवले. ती लगेच तिच्या जवळ गेली.

 " रेणू ताई... सॉरी ग मला अस काही बोलायलाच नको होते... आय एम सॉरी " 

रेणूचे डोळे पुसून ती रेणूच्या मिठीत शिरली. रेणूने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,

 " आपली काळजी घेणारं, आपल्याला ओळखणार, आपली आवड निवड जपणार एक माणूस सोबत असणं हे खरंच भाग्याचं लक्षण हाय ... तुम्ही खरंच लय भाग्यवान ताई... एवढी समदी जण तुमच्या जवळ आहेत, माझ्या सोनलच्या पदरचे सुख बी तुमच्या झोळीत पडो हीच त्या विश्वेश्वराला प्राथना " इतकं बोलून ती डोळे पुसत तिच्या खोलीतून निघून गेली. 

दिवसभरात झालेल्या घडामोडींचा साक्षी मागोवा घेत खिडकीशी बसली. नचिकेत, सुमित, भानू, माई आणि आता रेणू सगळेच तिच्या विचारांच्या भिंती भक्कम करत होते. एक क्षण हळवे झालेले मन दुसऱ्याच क्षणाला उसळून यावे. आठवणीत रमणाऱ्या मनाची अचानक चलबिचल व्हावी अशी काहीशी मनस्थिती तिची तेव्हा झाली होती.

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...