भाग : २६
साक्षीच्या वागण्यातला बदल नचिकेतला जाणवला होता. त्याने घरी येऊन आराध्याला विचारले.
" साक्षीचा हात कसा आहे आता ... ती ठीक आहे ना ... आज काही तरी वेगळीच वागत होती. तिला घरची आठवण येते का ?
आराध्या म्हणाली " मला तसे काहीच वाटलं नाही. मी आली तेव्हा खोलीत ती आराम करत होती. नंतर तस आमचं फारसं बोलणं झालं नाही. तिला मी जेवणानंतर विचारते. ती आज खाली पण फार दिसली नाही. खोलीतच आहे. जेवणासाठी मी तिला बोलवायला जाते. तेव्हा येईल ती खाली "
नचिकेत " बर ... बोलावं तिला " इतकंच म्हणाला आणि तिथून तडक खोलीत निघून गेला. जेवणाच्या वेळी सगळे आपापल्या जागेवर बसले. आराध्याने मुद्दाम विषय काढला
" आता कसे काम सुरू आहे दादा... होतच आले असेल ना आता "
नचिकेत म्हणाला " हो ... जवळपास झालेलेच आहे, तीन दिवसात आपल्याला रिझल्ट मिळतील. आपले प्रॉडक्ट बनून ते व्यवस्थित राहते की नाही ? किती दिवस टिकते ? हे पाहायला पुढे थोडा वेळ जाईल. पण महत्वाचं काम आता जवळ जवळ झालेच आहे. "
सुमित म्हणला " अरे वा ... म्हणजे मग आता परत आपल्याला ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला जाता येईल तर... हो ना साक्षी "
साक्षीने एकदा नचिकेतकडे पाहिले आणि सुमितला म्हणाली " हो आपण जाऊन येऊ एकदा. माई, आण्णा काम आता शेवटच्या टप्यात आले. एक दोन दिवसात ते ही होईल. मग मी पुन्हा माझ्या घरी जायचा विचार करते. "
आराध्या हे ऐकून म्हणाली " काय... अग लगेच परवा म्हणजे. थांब की अजून काही दिवस, माझा या महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण होतोय दोघी एकत्र जाऊया की परत "
साक्षी म्हणाली " आरु... नको अग आता अजून. हे सगळे लिहून मला पुढच्या ऍडमिशनची तयारी करायची आहे. त्याला आणखी वेळ लागेल. मी इथले सगळे काम पूर्ण करूनच जाणार आहे. पण आता जाऊ दे मला "
कितीही लाटा दूर दूर वाहत गेल्या तरी किनाऱ्याला आदळून पुन्हा आपल्याच वाळूत येऊन शांत होतात. तसे काहीसे साक्षी चे झाले होते. तिने तिच्या मनाशी ठरवले होते. काहीही झाले तरी आपल्या घराच्या वाटेवर पुन्हा जायचे. घराची ओढ तिला सतत माघारी बोलवत होती.
सुमित, भानू, रेणू काहीच बोलले नाही. नचिकेत जेवण करून उठला आणि काहीच न बोलता आपल्या खोलीत निघून गेला.
माई म्हणाली " साक्षी ... तू आलीस आणि आम्हा सगळ्यांसाठी एक आमच्या घरातलीच सदस्य झालीस ... कळलं पण नाही की तू आराध्याची मैत्रीण म्हणून आलीस, आम्ही विसरून गेलो की तू परत तुझ्या घरी जाणार आहेस ... बाळा खूप प्रगती कर, पण आम्हाला विसरू नकोस. " माईच्या डोळ्यात पाणी आले.
सगळ्यांची जेवण आटोपली. सगळे आपापल्या खोलीत गेले. साक्षीचा निर्णय हळूहळू सगळ्यांना मान्य झाला. नचिकेतच्या मनात मात्र साक्षीने प्रेमाचे बीज रोवले जे आता काही झाले तरी साक्षीचा निर्णय मान्य करत नव्हते. नचिकेतला साक्षीचे दूर जाणे मनाला वेदना देत होते. क्षणभर त्याच्या मनात तिच्या सोबत शहरात जाण्याचा ही विचार आला. त्या विचारात तो झोपी गेला.
क्रमशः
No comments:
Post a Comment