Thursday, 24 April 2025

२९. निरोपाचा क्षण

भाग : २७

     पुढच्या दोनच दिवसात नव्या सेटअपचे पहिले प्रोडक्ट तयार झाले. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. नव्या लावलेल्या कलमांना ही टपोरी गोड द्राक्षे लागलेली दिसली.  दोन्ही कामात यश मिळाले होते. सगळे मजूर, माई, अण्णा, भानू, रेणू, मिस्टर साठे त्यावेळी तिथे उपस्थित होते. प्रत्येकाच्या मेहनतीचे फळ उत्तम आणि भरगोस मिळाले. त्या दिवशी साक्षी, आराध्या, सुमित, नचिकेत परत ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला गेले. खर तर ती संध्याकाळ संपूच नये असे प्रत्येकाला वाटत होते. पुस्तकातला एक धडा संपतो म्हणजे पूर्ण पुस्तक संपले असे होत नाही. काही वेळा ती नव्याची सुरुवात असते. कदाचित साक्षीला हेच हवे होते. नवे काही तरी या गावाच्या मातीत पेरून या कथेचा शेवट तिला करायचा होता. गोडीवलीत तिच्या या धड्याचा शेवट जवळ आला होता  याची तिला जाणीव झाली. अंधार वाढल्यावर सगळे माघारी आले.
          
साक्षी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन निघणार होती. साक्षी सकाळी आपले सामान सुमान घेऊन खाली आली. सगळ्यांना भेटली. माई, अण्णा, आराध्या कोणाचीच साक्षीला अलविदा करण्याची इच्छा नव्हती. निघताना तिला तिथे नचिकेत कुठेच दिसला नाही. ती सगळ्यांमध्ये त्याला शोधत होती. तिला नंतर कळले, पहाटेच तो प्रयोगशाळेत गेला आहे. शेवटी ती निघाली. सुमित तिला सोडायला तिच्यासोबत निघाला.

सुमितने गाडी मुद्दाम बागेच्या रस्त्याने  नेली. तिथे थांबवून साक्षीने सगळ्या मजुरांचा ही निरोप घेतला. रेणू, भानू आणि योगायोगाने भानूच्या मैत्रिणी सखू, सुमी,चिंगी तेव्हा चरायला तिथे आल्या होत्या. त्याचा ही निरोप घेतला. मनोमन जुन्या आठवणी आठवत तिच्या चेहऱ्यावर हसू आले होते. 

" भाऊ... या मैत्रिणींना कधी एकटे सोडू नका ... मी तुम्हा सगळ्यांना मिस करणार आहे ... माझी आठवण कायम सोबत असुद्या " तिने एक छान से पेन भानूला भेट दिले. म्हणाली " तुमच्या सगळ्या प्रश्नांना या पेनाने लिहुन ठेवत जा ... मला माहिती आहे. सायंटिस्टना सारखे प्रश्न पडतात आणि तेव्हाच नवे शोध लागतात. तुम्ही ते नक्की कराल भाऊ... " 

भानू भावुक झाला, खाली झुकला. साक्षीने शर्टाच्या खिशाला ते पेन लावले. रेणू मागुन हे सगळे पाहत होती. रेणूच्या जवळ जाऊन साक्षी म्हणाली, 

" रेणू ताई, मी सोनल ची जागा कधीच घेऊ शकणार नाही. पण मी सतत त्याचा प्रयन्त केला. माझं काही चुकलं असेल तर सॉरी ... तुझ्यातली झाशीची राणी अजून माझ्या सोबत आहे. ती माझ्यात होतीच. आता तिला आणखी एक आई मिळाली. तुला खूप मिस करेन मी रेणू ताई " 

रेणू काहीच बोलली नाही. ती मनातून फक्त खूप सारे आशीर्वाद देत होती. साक्षी वळली तेव्हा फक्त " पुन्हा कधी येणार साक्षी ताई ? " इतकंच ती बोलली. साक्षी काहीच बोलली नाही, जाऊन गाडीत बसली. तिथूनच तिने रेणूला अलविदा केले. सुमितला तिथून निघायला सांगितले. गाडी थेट बस स्टँडकडे न्यायला सांगितले. 

होकारार्थी मान हलवून ही सुमितने गाडी मात्र थांबवली ती ओढ्यापाशी ... तो म्हणाला " उतर एक मिनिटं ..  हा आमच्या गावचा ओढा आवडला ना तुला... जा एकदा जवळून बघून ये शेवटचं " 

साक्षी आता गाडीतून उतरणारच नव्हती. पण तिचे मन तिला त्यासाठी भाग पाडत होते. ती शेवटी उतरलीच. सुमित गाडीतच बसून होता. दूर कट्ट्यापाशी पाठमोऱ्या आकृतीत कोणीतरी बसलेले तिला दिसले. दोघे जण होते. तिने पुढे जाऊन पाहिले तर तीच सहा वर्षांची बाहुलीसाठी घर मागणारी मुलगी नचिकेत सोबत बसली होती. तिला ही तो ओढा आवडला होता. आता ही तिच्या एका हातात ती बाहुली होती आणि दुसरा हात नचिकेतने घट्ट पकडला होता. सोनलसाठी आणलेला तो झगा तेव्हा त्या मुलीने घातला होता. अबोली रंगाच्या फ्रॉक मध्ये तिला पाहून साक्षीच्या डोळ्यात पाणी आले. क्षणभर सोनल समोर बसल्याचा भास झाला. बाहुली घेऊन ती मुलगी उतरली आणि साक्षीला पायाशी जाऊन मिठी मारली. साक्षी खाली बसली. तिला पापी देऊन मिठीत घेऊन रडू लागली. 

हे सगळे सुरू असताना नचिकेत फक्त पाहत होता. आपल्या वाटचा आनंद समोर त्या मुलीच्या जवळ ओसंडुन वाहत होता. फार काही न बोलता त्याने फक्त इतकंच म्हणलं " पुन्हा भेटू ... साक्षी, मी तुझी वाट पाहीन "

साक्षीने नचिकेत कडे पाहिले, ती काहीच न बोलता गाडीत जाऊन बसली. बघता बघता साक्षीचा सुरू झालेला प्रवास परतीच्या वळणावर येऊन थांबला होता. फरक इतकाच होता की यावेळी घरची ओढ तिला तिथे थांबू देत नव्हती. पण तिचे मन मात्र तिथेच रेंगाळत होते. ओढ्यावर. दोलायमान मनस्थितीत शेवटी आपल्या परिघातून बाहेर आलेल्या तिच्या व्यक्तीमत्वाला तेच वर्तुळ पुन्हा बोलवत होते. जाता जाता इथे एक मोठे वर्तुळ निर्माण करून तिने सारेच सिद्ध केले होते. निघताना वर आलेला सूर्य त्या वर्तुळाची तिला जाणीव करून देत होता. त्याकडे पाहतच ती गाडीत बसली आणि सुमितने गाडी सुरू केली. नचिकेत गाडीला दूर जाताना पाहत राहिला. त्याच्या आयुष्यात नकळत आलेले हे एक सुंदर स्वप्न होते... साक्षी... जे आता संपले असं त्याच्या मनाला वाटू लागले. साक्षी परत मुंबईला गेली. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...