Tuesday, 22 April 2025

२६. जुन्या आठवणी

भाग : २४

        रेणूने साक्षीला हाक मारली. नचिकेत क्षणार्धात भानावर आला आणि दूर झाला. साक्षी तिथेच बसली होती. रेणूने येऊन तिला पोटाशी धरले. तिच्या पाठीवरून हात फिरवत ती तिथेच थांबली.  नचिकेत तडक बाहेर निघून आला. भानू त्याच्या मागे मागे आला.  भानू तेव्हा काहीच बोलला नाही. दोघेही बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधारात कट्ट्यावर बसले. नचिकेतला क्षणभर काय होते हे ही कळले नाही. भानूने नंतर थोड्या वेळाने त्यांना विचारले,

" घरी वाट पाहत असतील ना समदी ... निघुया का दादा ? "

नचिकेतने त्याला आलिंगन दिले. त्याला म्हणाला,

" भानू होईल ना सगळे ठीक ... प्रत्येक जण मेहनत करतोय, यशाच्या वाटेवर इथे आनंद तर आहेच पण सोबत खोलवर होणाऱ्या जखमा पण आहेत रे... त्या बघवत नाहीत. " 
 
भानू म्हणला " दादा... तुम्ही काळजी करू नका ... होईल समद ठीक " 

भानू काही वेळ नचिकेतकडे पाहत मनातल्या मनात म्हणत होता. " देव तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका दादा "

कधी कधी काही गोष्टी का घडतात याची कारणे आपण बरेचदा शोधत असतो. खूप प्रयन्त केला तरी त्याचे उत्तर मिळत नाही. आपल्या मनातल्या वादळाला शांत करणारी व्यक्ती आपल्या शेजारी येते. आपल्या ही नकळत. बसते आणि हवी तशी शांतता आपोआप मिळते. प्रश्नोत्तराच्या वादळात शांत करणारी तशी व्यक्ती कधी कधी आपल्यासाठी देवासारखी होऊन जाते. आज नचिकेतला भानू मध्ये तसेच काहीसे दिसले. नचिकेत आणि भानू तिथून उठले गाडीत जाऊन बसले. भानूने बाहेरूनच हाक दिली 

" रेणू ताई, साक्षी ताई चला निघू आता " 

रेणू साक्षीला घेऊन आली. घरी पोहोचल्यावर आराध्याने साक्षीचा हात पाहिला. धावत जवळ आली. साक्षीचा हात बघून आराध्याने रेणूला विचारले,

" रेणू ताई, हे काय झालं हिला ? " - आराध्या

" ताई काच लागली... त्याची जखम झाली. दादांनी मलमपट्टी केली. साक्षी ताईला आराम करुदे ..." - रेणू

" साक्षी चल वर, उद्या डॉक्टर कडे जाऊ आपण... बघू किती लाल झाला हात... बापरे " - आराध्या

" अग विशेष काही नाही. दिवे गेले त्यामुळे कळलं  नाही इतकंच आता मी ठीक आहे आरु " साक्षी तिथेच बसली आणि म्हणाली. 

माईने आल्या आल्या तिला औषध गोळ्या दिल्या. लागलीच जेवण ही झाले. साक्षी आराम करायला खोलीत गेली. 

औषध घेतल्यामुळे तिला लगेच झोप लागली. नचिकेत काही रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी साक्षीला उठायला उशीर झाला. तो पर्यंत सगळे आपापल्या कामाला निघून गेले होते. साक्षी उठल्यावर माईने साक्षीची विचार पूस केली. तिला एक दिवस घरीच आराम करायला सांगितला. तिने त्या दिवशी घरी राहून च थोडे फार काम केले. बाकी वेळ माईसोबत बोलण्यात गेला. आराध्या, सुमित, भानू, नचिकेत सगळ्यांविषयी ऐकताना साक्षीला भारी कुतूहल वाटले. माई सांगता सांगता आठवणीत रमून गेली

 " आराध्या लहान होती ना तेव्हाची गोष्ट आहे साक्षी, एकदा नचिकेत आराध्याला घेऊन शहरात गेला होता. त्यात सुमित पण लहान होता. दोघे ही शाळेत शिकत होते. कॉलेजची सुट्टी होती तेव्हा दादा घरी आला होता. फार हौसेने दोघांना शहरात घेऊन गेला. दिवस भर फिरल्यावर परतीच्या प्रवासात आराध्याला सुमितने गाडीच्या मागच्या सीट वर बसायला सांगितले. ही आमची आरु झोपली तिथेच आणि कधी मागे डिकी पर्यन्त गेली कळलं नाही. सुमितला माहिती होते ती झोपलेली पण पठ्ठ्याने सांगितले नाही. मोठा गोंधळ झाला. नचिकेतला खूप मारले अण्णानी. गाडी पुन्हा जाऊन पहायची ही त्याला भ्रांत नव्हती. तो रात्र भर जेवला नाही. की कोणाशी बोलला नाही. आराध्या कुठे असेल या भीतीने आम्ही झोपलो ही नाही.  आता सारखे तेव्हा रस्तावर दिवे ही नव्हते. त्यामुळे सकाळ ची वाट पाहत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तशाच रडवेला चेहरा घेऊन नचिकेत आराध्याला शोधायला निघाला. गाडीत कोणी असेल हे ही त्याला कळले नाही. शेतातुन गाडी जाताना उड्या मारू लागली. त्यामुळे आराध्याला जाग आली. ती गाडीत रडायला लागली. तास भर दोघे तिकडेच होते. आराध्याला शांत करता करता दादा ची पार नाकेनऊ आलेली ग ... " 

माई हे सगळे सांगताना साक्षीला कंपनीत झालेला अपघात, ओढ्यावरचा घालवलेला तो दिवस आठवला. काजव्याच्या प्रकाशातले ते झाड आठवले. 

माई पुढे सांगत होती " तो प्रसंग आठवला की घरी कधी कधी हशा पण पिटतो. नचिकेत मात्र त्या दिवसापासून अगदी जबाबदार मुलगा झाला. कॉलेज संपवून जो घरी परत आला. तो आज वर सगळ्यांची काळजी घेत सोबत आहे, बघ. आम्ही सगळे त्यामुळे अगदी निश्चिंत आहोत. या घराला, शेतीवाडी, बागा या सगळ्यांना त्याची सवय लागली. त्याने ही फार जीव लावला आहे बघ साक्षी. अचानक माईंच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. साक्षीने भावनेच्या भरात त्यांना आलिंगन दिले. नचिकेत आणि भानू साक्षीच्या अगदी जवळची दोन माणसे झाली होती. ती ही तेव्हा रडू लागली. माईने हसून तिचे डोळे पुसले.. " असेच असते बघ... तुझ्या डोळ्यात पाणी ... वेडा बाई...दूरवर कुठेतरी बोलवणारे आपलेच आपल्याला शोधत येते. तू जशी आमच्यात आलीस. " 

दोघींच्या गप्पा तासभर सुरू होत्या. माईसोबत गप्पा मारताना आपसूकच साक्षीला आपल्या आईची आठवण झाली. ती भावुक झाली. माईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आपल्या आईला जशी मिठी मारायची तशीच मिठी साक्षीने माईला मारली. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...