Monday, 21 April 2025

२५. हळवे तरंग

भाग : २४

      नचिकेत धावत प्रयोगशाळेत आला. त्याने साक्षीला पाहिले, तिथे इतरत्र काचा पडलेल्या दिसल्या. क्षणभर तो स्तब्ध झाला.  चुकीच्या ठिकाणी बर्नर आणि बिकर ठेवल्याने गरम होऊन तो फुटला होता. नचिकेतचे लक्ष साक्षीच्या हाताकडे गेले. बिकरची काच तिच्या हाताला लागली.  तो बाजूला करताना बर्नरचा  चटका लागून हाताला सूज ही आली आणि भळाभळा रक्त ही वाहू लागले. अंधारात काही कळत नव्हते. नचिकेत आत आला. त्याने टॉर्च सुरू केला. पाहतो तर साक्षीच्या हातातून रक्त वाहत होते. तिने त्यानंतर ही काही आवाज केला नाही. पण नचिकेतला मात्र तिचे हे वागणे आवडले नाही. त्याने अंधारातच first-aid box शोधला. तिचा हात पाण्याखाली धरला. बसून तिच्या हाताला मलम पट्टी केली. आता पर्यन्त सगळे ठीक होते. तिचा हात हातात घेऊन त्यावर औषध लावताना अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

आज वर कधी न पाहिलेले नचिकेतला असे साक्षी आज वेगळ्याच रुपात पाहत होती. प्रत्येकाला हुरूप देणारा नचिकेत एवढा हळवा झाला होता. तिला वेदना होत होत्या. पण तिने तोंडातून ब्र ही काढला नाही किंवा डोळ्यातून थेंब ही आला नाही. नचिकेतच्या डोळ्यातले पाणी मात्र बरोबर साक्षीच्या हातावर पडत होते. त्याचा हात साक्षीच्या जखमी हातावर अलगद स्पर्श करत होता. त्यावर हळूहळू फुंकर मारत त्याने औषध लावले. पट्टी ही लावून झाली. तेव्हा मात्र तिच्या तोंडून " आई ग " निघाले. नचिकेतने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या लागलेल्या हाताला जवळ घेऊन त्यावरून हात फिरवला. दोघेही भावनिक झाले. रेणू आणि भानू दोघे इतक्यात आले होते. ते दारातच स्थिर झाले. भानू ते पाहून स्थिमित झाला आणि म्हणाला, 

" हे कधी तरी होणारच होते " 

बराच वेळ साक्षी नचिकेतच्या मिठीत होती आणि नचिकेत काहीच बोलू शकला नाही. थोड्या वेळासाठी सारे अस्थिर जग एका मिठीत स्थिरावले होते.
    
रेणूला काही कळत नव्हते पण तिला आनंद झाला होता. साक्षीची काळजी करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली याचं तिला समाधान होते. तिच्या ही डोळ्यात पाणी आले. अंधारातच साक्षीने नचिकेतचे डोळे  पुसले. तिने  नचिकेतला पाणी दिले. तिच्याकडे पाहत तिच्या हाताला हातात घेऊन नचिकेत म्हणाला,

 " साक्षी... तू काळजी घेत नाही स्वतःची ... काम करताना तुला कळत नाही का काळजी घ्यायची ... काही झालं म्हणजे तुला ? " 

साक्षी काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेऊन पुन्हा एक मिठी मारली. नचिकेतच्या डोळ्यात परत पाणी आले. ती त्याला धीर देत होती. इतक्यात दिवे आले. भानू आणि रेणू दोघे ही आत आले. याच त्या भावनिक तरंगावर साक्षीचे विश्व अवलंबून आहे. याची जाणीव तेव्हा साक्षीला झाली. तिच्यातली बंडखोर वृत्ती हळूहळू निरव शांत आणि प्रवाही झाली ती त्यामुळेच. रेणू आणि भानू नचिकेत जवळ आले आणि भानूने आपला हात नचिकेतच्या खांद्यावर ठेवला. 

- क्रमशः

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...