Wednesday, 9 April 2025

१७. विचार चक्र

भाग : १६

     दुसऱ्या दिवशी आराध्याने साक्षीसाठी गरम चहा आणून दिला. तिला खायला काही तरी आणून दिले. साक्षी रात्रभर जागीच होती. त्या दोघींसोबत नचिकेत आणि भानू देखील वोर्डच्या बाहेर बसलेले होते. अचानक तिचा फोन वाजला. साक्षीला तिच्या बाबांचा फोन आला होता. तिच्या आवाजावरून बाबांना शंका आली. ती फार काही बोलू शकली नाही. हाल हवाल विचारून तिने फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात तिथे माई, अण्णाना घेऊन सुमित आला. माई, अण्णा बाकीच्या जखमी गावातील लोकांची चौकशी करायला ओ पी डी मध्ये गेले होते. सुमित नचिकेतच्या शेजारी जाऊन बसला. त्याला म्हणाला,
" तुझी खूप दगदग झाली... दादा... घरी जा आणि आराम कर आता. " 
 नचिकेत म्हणाला " खरंच फार वाईट दिवस होता सुमित कालचा ... मी कधीही विसरणार नाही. " 
" यातून ते सगळे लोक कसे उभे राहणार... सगळ्यांची च घर गेली. आपली रेणू तर जिवंत पुतळा झाली आहे बघ तिथे. तिला मी तरीही सांगितलं होतं ... घराकडे लक्ष दे.. गेलं ना सगळं आता. " 
" तिने सावरायचे  तरी कोणासाठी आता, माय लेकी दोघीच तर होत्या एकमेकींसाठी... सोनलचे वडील पाऊस पडत नव्हता म्हणून गेले आणि ही मुलगी पाऊस पडला म्हणून. किती सहन करायचे एका कुटुंबाने ? तिला उत्तर देणार तरी कोण ? "

 नचिकेतने त्याचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. सुमित त्याच्या हाताला धरून त्याला बिलगला. 
" आपण सगळे आहोत ना, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आता तुम्ही तिघे घरी जा माई , अण्णा पण आलेत, त्यांना पण थोड्या वेळात घरी पाठवतो. मी आहे इथे डोन्ट व्हरी. या जवानाला संधी कधी मिळणार युद्ध जिंकण्याची ! ही परिस्थिती आपल्यासाठी त्याहून कमी नाही. भानू तू पण वाड्यात जाऊन आराम कर. रेणूला पण आपल्या सोबतच राहू दे. काही दिवस आपण सगळे एकत्र राहू " 

भानू जागेवरून उठला. ओ पी डी च्या बाजूच्या रूम मध्ये रेणू निपचित पडलेली होती. तो उठून दरवाजापर्यन्त गेला. गोलाकार खिडकीतून  रेणूला पाहत काचेवर हात ठेवून तो बोलू लागला,
 " दादा ... खरंच तुमचे लय उपकार आहेत. देवच आले तुमच्या रूपानं आमच्यासाठी. देवाने घेतलं ओरबाडून सगळं आमचं, पर तुमच्या सारखी देव माणसं ठेवली बघा इथं, ही रेणू बघा... देवाने हिला नेलं नाही. अजून जीनं जग पाह्यलं बी न्हाई त्या सोनलला घेऊन गेला. आमच्या सारखं एखादं मेंढरात मन रमवल बी पर हीच काय व्हायचं ? आता पण कळत न्हाई. कुठं जावं ? काय करावं ? उघड्यावर पडलोय आम्ही आता. डोकं झाकायला तुम्ही आम्हाला जागा देताय ... तुमचं पाय धरले पाहिजे " भानू बोलता बोलता भावनिक झाला. 

नचिकेतने सगळ्यांचे चेहरे पाहिले. निस्तेज झालेल्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. नचिकेत उठून उभा राहिला. साक्षीच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवत आराध्याकडे पाहत म्हणला, 
" चला घरी जाऊ आता... पुरे झाले सारे. " 

साक्षी उठली. तिने आराध्याचा हात हातात घेतला. साक्षी, भानू आणि आराध्याला घेऊन नचिकेत घरी गेला. घरी गेल्यावर त्याने भानूला वाड्यातली एक खोली दिली. आराध्या, साक्षी त्यांच्या खोलीत गेल्या. नचिकेतने थोड्या वेळाने येऊन त्यांच्या खोलीत पाहिले. दोघी गाढ झोपल्या होत्या. मनाचा आणि शरीराचा दुहेरी थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दार पुढे ओढून तो परत आपल्या खोलीत आला. थोडा वेळ तिथेच पलंगावर आडवा झाला. पुढे बराच वेळ त्याला झोप लागली नाही. आदल्या रात्रीचे प्रसंग सतत समोर येत त्यावर विचार चक्र सुरू होते. डोळे मिटून तो तसाच पडून राहीला. पुढे कसे होणार याची चिंता त्याच्या मनात घर करू लागली. नकळत या संकटात आपल्या द्राक्ष पिकाचे ही नुकसान झाले आहे, हे तो जाणून होता. साक्षीचा प्रोजेक्टचा काळ पण संपत आला होता. तिला तिचे प्रोजेक्ट पूर्ण करून पुन्हा घरी जायचे होते. तिने या सगळ्याचा धक्का घेतला तर... असे असंख्य प्रश्न समोर होते. दिवसभराच्या थकव्याने शेवटी त्याचा डोळा लागला. तासाभराने दारात माणसांचा आवाज बाहेरून येऊ लागला. माई, अण्णा घरी आले होते. नचिकेत उठून बाहेर आला. 

क्रमशः


No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...