भाग : २०
साक्षीच्या दुपारच्या बोलण्यावरून नचिकेत अजून ही नाराज होता. फारसे कोणाशी काही बोलला नाही. साक्षीला मात्र या गोष्टीचा काहीच अंदाज नव्हता. साक्षीने ठरवल्याप्रमाणे गेल्या गेल्याच आराध्याकडे कच्च्या मालाचा विषय काढला. तिला याबाबत तिच्या मनुफॅक्चरिंग डिपार्टमेंट मध्ये विचारायला सांगितले.
आराध्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रस्ताव सगळ्यांसमोर ठेवला. तिच्या प्रयत्नांना तात्काळ यश आले होते. कंपनी कडून त्याक्षणी ग्रीन सिग्नल मिळाला. काही द्राक्षे पेट्या कंपनीत ट्रायल म्हणून आणण्याची परवानगी मिळाली. यात पुढाकार साठ्ये सरांनी घेतला. आराध्या ही आनंदाची बातमी घेऊन घरी परतली. नचिकेतपर्यन्त ही बातमी अजून पोहोचली नव्हती. आराध्या कडून ऐकल्यावर तिचे त्याने फार कौतुक केले. तिला मिठी मारली. त्या दिवशी तिघेही ओढ्यावरचा सूर्यास्त पाहायला गेले. नचिकेतला आनंद होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक सल मात्र राहिली होती. साक्षीचे शब्द त्याच्या काळजात घर करून बसले होते. साक्षी, आराध्या, नचिकेत घरी आले. आशेचा एक एक किरण प्रजवलीत होत होता. गोष्टी मार्गी लागत होत्या. भानूला नचिकेतच्या चेहऱ्यावरची चिंतेची आठी मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
जेवणाच्या टेबलावर सगळे बसलेले असताना नचिकेतने पुन्हा आराध्याने केलेल्या कामाचे कौतुक केले. सगळ्यांनीच नंतर तिचे तोंडभरून कौतुक केले. आराध्या तेव्हा म्हणाली,
" दादा... याच श्रेय माझ्या सोबत साक्षीला पण जाते. तिने काल रात्री मला येऊन तिथली परिस्थिती सांगितली आणि त्यावर ही युक्ती पण सांगितली. तिने जर सुचवले नसते तर आजचा आनंद सेलिब्रेट करता आला नसता. "
नचिकेतने तेव्हा साक्षीकडे पाहिले. साक्षी काहीच बोलली नाही. थांबलेल्या पाण्याला जसे अचानक प्रवाह मिळतो तसे काहीसे नचिकेतचे झाले. साक्षीच्या त्या दिवशीच्या परखड बोलण्याचा आता त्याला अर्थ कळू लागला होता. आपल्याच मनातल्या आंदोलनावर विजय मिळवण्यासाठी साक्षीने तेव्हा तसे बोलले असावे. असे काहीसे वाटले. साक्षीकडे पाहिल्यावर त्याला आता नवीन आशा आणि यशाचा मार्ग दिसू लागला होता. तो तिच्याकडे पाहतच राहिला.
भानू बोलू लागला " खरंय खरंय ... साक्षी ताई हे बेस्ट झालं. तुमचं पण कौतुक ओ. "
रेणू, माई, अण्णा, सुमित सगळेच एकत्र होते.
" साक्षी लय गुणांची पोरगी बरं दादा. मला ती माझ्या सोनलपेक्षा वेगळी न्हाई. लेकच हाय माझी. " रेणू शेजारीच उभी राहून म्हणाली. तिच्या डोळ्यात आपसूक पाणी आले.
" खूप मोठी हो पोरी... " अगदी मोजून मापून बोलणारे अण्णा ही साक्षीचे कौतुक करत म्हणाले.
नचिकेतच्या चेहऱ्यावर तिला दिलेल्या या संधीचे समाधान होते.
" चला तर मग आज परत राघूची संगीत मैफिल होणार तर " - सुमित .
" हो तर ... दादा आपण दोघे असणार हो त्यात " भानू नचिकेतला म्हणाला.
" हो ... हो " म्हणत नचिकेत जेवणाच्या ताटावरुन उठला. सगळ्यांची जेवण आटोपली.
रात्रीची मौफिल रंगली. गप्पा, गाणी, मजा मस्ती करून सगळे आपल्या खोलीत ही गेले. सुमित जाताना राघूला न्यायला विसरला. त्याचा पिंजरा तिथेच खिडकीशी राहिला. भानू नचिकेत तिथेच होते. भानूने नचिकेतला थोडा वेळ थांबायला सांगितले.
त्याला विचारले,
" दादा...तुम्हाला पाहून आनंदचं होतो. पण या आनंदाचं खरं कारण कळलं आम्हाला आता ! "
" भानू... अरे बघ ना ... आता थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटते. हे सगळं साक्षी मुळे शक्य झालं " - नचिकेत
" ते झालंच दादा... पर साक्षी ताईच्या कौतुकामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद डबल झालेला तिथं टेबलावर सगळ्यांनी पाहिला. त्याच काय.. ! - भानू
" खरं तर मी हे आधीच हेरलं पर म्हणलं वेळ आली की सांगेन " - भानू
" तुझं आपलं काही तरी असतं, चल झोपायला जाऊ " - नचिकेत
" उद्या आरुच्या कंपनीत जायचे सॅम्पल घेऊन.. " - नचिकेत
" हो हो जावा की साक्षी ताईला पण घेऊन जावा सोबत.. इथं मी आहे बागेत. त्याची चिंता करू नका " - भानू
सुमितच्या लक्षात आले तो राघूचा पिंजरा तिथेच ठेवून आला. तो घ्यायला तिथे आला होता. दाराच्या जवळ उभे राहून त्याने भानू आणि नचिकेतचे सगळे बोलणे ऐकले. निघताना राघूच्या ही पिंजऱ्यातून तेव्हाच साद यावी. नकळत राघूच्या हाकेला सुमितने प्रतिसाद द्यावा. सुमित समोर आला.
सुमितला पाहून नचिकेत म्हणाला " झोपला नाही का जवान ... येत च होतो मी "
" हो दादा... मी राघूला तिथे च ठेवले, हे खोलीत गेल्यावर लक्षात आलं. म्हणून आलो. मी नंतर येऊ का ? " - सुमित
" अरे इतकं काय... मी याला घेऊन आलो असतो...आलास तर घेऊन चल " - नचिकेत
" चल भानू " - नचिकेत
भानू, नचिकेत, सुमित सगळेच आपापल्या खोलीत गेले. आनंद तर होताच पण भानू जे काही बोलला त्यावर विचार करता नचिकेतला बराच वेळ रात्री झोप लागली नाही. एका कुशीवर वळून त्याचे मन भविष्याची मांडणी करू लागले होते. काटेरी वाटणाऱ्या वाटेवरचे बोलवणारे यशाचे, प्रगतीचे हात त्याला दिसु लागले होते.
क्रमशः
No comments:
Post a Comment