Tuesday, 15 April 2025

२०. भविष्याची मांडणी

भाग : १९

    आता पर्यंत बऱ्याच बिऱ्हाडानी आपली राहण्याची सोय ग्राम पंचायती च्या मदत निधीतून केली होती. आता प्रश्न होता तो फक्त पोटाचा ! नचिकेत प्रयोगशाळेत काम करत असताना भानू त्याच्या जवळ आला. त्याने नचिकेतला बोलता बोलता विचारले,

 " दादा... कामाचा व्याप एकटे घेऊ नका. काय असेल तर कधीही बिनधास्त सांगा, एकत्र करूया ..." 

" हो ... भानू, तू म्हणतोय ते खरं आहे, पण आपल्या सगळ्या मजुरांना थोडे तरी प्रत्येकाला पैसे मिळायला हवेत आणि या फक्त उत्पन्नाच्या द्राक्षाच्या पेट्या त्याचे पोट भरू शकत नाही. त्याचे पुढे काही तरी करता आले असते तरी थोडा प्रश्न मिटला असता. पण आता करायचे तरी काय,  पुढे हा प्रश्न आहे. " - नचिकेत 

" ते बी खरंय ... आपली ताई काही तरी करत असती ना कंपनीमध्ये, तिला आपण इचारल तर " - भानू

 " त्यांचं काम वेगळं असतं रे... आपल्यालाच यातुन मार्ग काढावा लागणार. " - नचिकेत 

नचिकेत, भानू बाहेरच्या नवीन कलमांना पाहण्यासाठी गेले. तेवढ्यात साक्षी घरून आली. साक्षीला पाहून भानू मोठ्याने ओरडला, 

" छोट्या सायंटिस्ट आल्या ...साक्षी ताई या... " 

" भाऊ, आज काय करायचं ... नचिकेत कुठे ?  " - साक्षी

" ते काय तिकडं... रोपटी बघतात नवीन लावलेली... लय टेन्शन आहे दादांना, म्हणले नुसती पेटीतली द्राक्ष तरी किती जण घेणार "  - भानू

" काय करता येईल ? " - साक्षी

" मी काय सांगणार ... तुम्ही उलट काहीतरी सांगा. आरु ताई कंपनीत जातात. तुम्ही इथे शोध लावता.. माझ्यापेक्षा तुम्हीच मार्ग काढाल. " - भानू 

" भाऊ... खरंय आपल्याला काही तरी केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही सुचते काय... "  - साक्षी

 " आपल्याला या गावाच्या सीमा ओलांडून पुढे जावे लागेल. नचिकेत, तेव्हा अनेक मार्ग मिळतील. तू याचा विचार का नाही करत?  गोडीवली मध्ये तू कायमस्वरूपी बांधून राहू नको. बाहेर खूप प्रगतीच्या वाटा आहेत. तू फक्त एकदा यावर विचार कर. " साक्षीने रोपं पाहता पाहता नचिकेतला सुचवले.

साक्षीचे बोलणे नचिकेतला फारसे रुचले नाही. आज वर त्याचे मत अगदी विरुध्द होते. त्यामुळे त्यावर तो काहीच बोलला नाही. शहरातून शिक्षण घेऊन आल्या नंतर त्याचे या मातीशी असे काही घनिष्ठ नाते जोडले गेले होते की, त्याची या गोडीवलीशी जोडलेली नाळ वेगळी करणे काही सहज सोपे नव्हते. आपल्याच आईच्या जवळ आपले सगळे सुख दुःखाचे क्षण व्यथित व्हावे ही त्याची प्रामाणिक इच्छा असायची. त्यावर साक्षीचे हे परखड बोलणे त्याला काटेरी वाटले. 

क्षणिक शांतता पसरली. ती मोडण्यासाठी भानू पुढे म्हणाला;

" तुम्ही नक्की काही तरी शक्कल लढवाल दादा. मला इश्वास हाय तुमच्या वर " 

" बघू चल बसून चालणार नाही आता " - नचिकेत

साक्षी तिच्या विचारात होती. काही तरी आठवण्याचा प्रयत्न करत होती. भानू आणि नचिकेत लॅबचे केमिकल्स चेक करत होते. साक्षीच्या चेहऱ्यावर अचानक आनंद पसरला. ती लगेच भानू कडे आली. 

" भाऊ... आपण एक करू शकतो. मला आधी का सुचले नाही ! येस... येस...मी आजच आरुशी बोलते. " - साक्षी

" काय बोलणार ... मला बी सांगा की ताई " - भानू

 " भाऊ तुम्हीच तर सुचवलं ... आपण आपले द्राक्ष पीक आरुच्या कंपनीला देऊ शकतो. आपल्याकडे कच्चा माल आहे ना, नक्कीच थोडे पैसे जास्त मिळतील. ती कंपनी पण तशी नावाजलेली आहे. मी असच करते. थँक्स भाऊ, आजच आरुशी या बद्दल बोलते. " - साक्षी

 " ते नव्ह, एकदा दादांना पण ईचारा " - भानू 

 " हो ते बघू ना पुढे, आरुला काय वाटते ते बघू , कंपनीच्या कच्च्या मालाविषयी तिला ही माहिती झाली असेल. " - साक्षी

 " बरं चला आता बाकीची काम करू... मला फॉरमुलेशन बनवायचे आहेत. तुमची मदत लागेल. काही साहित्य आणायचे मार्केट मधून, तेवढं आणून द्या. " - साक्षी

" जी लगेच आणतो. " - भानू

साक्षी तिच्या कामाला लागली. भानू मार्केट मध्ये गेला. काम उरकून सगळे आपापल्या घरी आले. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment

३०. कृषी मेळावा

भाग : २८      मुंबईत साक्षी आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत होती. ऍग्री प्रोडक्ट मार्केटिंगचा एम बी ए कोर्स ती तिच्या शहरातून करत होती. डिग्रीच्...